इस्लामपूर – जीवनात जे कराल ते मनापासून करा, ओव्हर कॉन्फिडन्स बाळगाल तर मी पुन्हा येईनफ सारखे होऊन जाते. तुमचे स्वप्न एकट्याचे नाही, पालकांचेही आहे, याचे भान बाळगा, असा सल्ला युवानेते आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. श्रीरंग गायकवाड अध्यक्षस्थानी होते. आमदार रोहित पवार, माजी मंत्री शशिकांत शिंदे, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव सरोजमाई पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, अध्यक्ष आर. डी. पाटील, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, ऍड. एन. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले, अडचणी येत राहतात. प्रयत्न करत राहा, अपना टाइम आता है. कॉलेजचे दिवस परत येत नाहीत. पण हा काळ जबाबदारीचाही असतो. कर्मवीर कॉलेजची ऐतिहासिक परंपरा घेऊन आपणाला पुढे जायचे आहे. येथील स्पर्धा परीक्षा केंद्र उत्तम आहे. परिसराचा विकास जयंत पाटील यांच्यामुळे झाला आहे. राजकारणात ते प्रामाणिक सेवा करत आहेत.
ते आणि पवार साहेब यांच्यात साम्य आहे. कितीही त्रास झाला, टेन्शन आले की त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत नाही. त्यांचे मिश्किल हास्य महत्त्वाचे असते. पालकमंत्री झाल्यानंतर सामान्यांना आवश्यक सुविधांचा धडाका त्यांनी सुरू केलाय. पवार म्हणाले, आई वडिलांचे प्रेम हा सर्वांना मिळणारा नशिबाचा समान भाग आहे. कॉलेजजीवन आणि व्यवहार यांची सांगड घाला. आवडीच्या विषयाला प्राधान्य द्या. कलेत आवड असेल तर दुर्लक्ष करू नका.
आपले आदर्श कोण हे समजून घेतले पाहिजे. आपले मेंटर वेगवेगळे असतात. आपले हिरो कुणीही असू शकतात. व्यक्ती त्या-त्या जागेला काय निर्णय घेतो हे महत्वाचे आहे. संधी आली की ती समजून त्याचे सोने करण्यासाठी प्रयत्न करा. युवकांना राजकारणातही संधी आहेत.
दिल्ली निवडणूकित सर्वसामान्यांची ताकद ज्यांच्या बाजूने त्यांच्या हातात सत्ता जाते हे दिसले. बाहेर जग वेगळे आहे, मोठी स्पर्धा आहे. जग वेगाने बदलतंय.
ज्या क्षेत्रात आहात, त्यात चांगला अभ्यास आवश्यकच आहे. जगात काय चाललंय समजून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा. व्यावसायिक व्हा. महान आदर्शांचा खरा विचार आत्मसात केल्यासच परिवर्तन शक्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक बदल आणि विकास घडवूया.
शशिकांत शिंदे म्हणाले, जयंत पाटील यांचा पायगुण चांगला आहे. ते अध्यक्ष झाले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. काही लोक नुसते म्हणतात की, मी पुन्हा येईन; पण रोहित पवार यांच्याकडे पाहून वाटते की ते कायम पुन्हा येत राहतील. महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नांसाठी ते पुढे येतील. माझी कॉलेज जीवनात राजकीय सुरवात झाली आणि आज मंत्रीपदापर्यंत प्रवास झाला.
जाणता राजा शरद पवार यांचा इतिहास रोहित टिकवतील. भारतीय राजकारणात धर्मवाद वाढतोय. मनमोहन सिंग यांच्या काळात देश आर्थिक महासत्ता होईल असे वाटत असताना आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुणांनी पुढे जावे, स्पर्धा करावी. त्यांच्यात इतिहास घडविण्याची क्षमता आहे. उद्याचा महाराष्ट्र तरुणांच्या बेरोजगारीचा होऊ नये. महासत्ता होतांना या तरुणांना आश्वस्त करण्याची गरज आहे.
श्रीरंग गायकवाड म्हणाले, तरुणाईचा बुद्धिभेद केला जात आहे. दुही निर्माण करून विचारात बदल घडवून राजकीय स्वार्थ साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फुले, कर्मवीर भाऊराव यांचा आदर्श घेतला पाहिजे.
तरुणांनी महिलांप्रति आदर, सन्मान देण्याची जबाबदारी घ्यावी. धार्मिक राजकारणाला तरुणाईने बळी पडू नये.
जात, धर्म, पंथ यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत हे लक्षात घ्यावे. प्रा. बी. जी. कांबळे, राजेश दांडगे, अजितकुमार पाटील, पी. एच. पाटील, व्ही. बी. सुतार, जगन्नाथ नांगरे, संपत वारके यांचे सत्कार झाले. प्रा. एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद गंगणमाले यांनी सूत्रसंचालन केले. सौ. एस. के. खटावकर, अमित माने, एन. एस. शिंदे, डी. जी. चव्हाण, संतोष पाटील उपस्थित होते. यांनी आभार मानले.