मुंबई – राज्यातील सर्वच विद्यापीठांमधील पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा प्रश्न अद्याप पुरता सुटलेला नसताना आता सध्याच्या चालू शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
कोणत्याही विद्यापीठाने अद्यापही शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे ऑनलाइन वर्ग जुलैपासून सुरू झाले असले तरी नेमके सत्र कधी संपणार आणि परीक्षा कधी आणि कशा होणार याबाबत सर्वच पातळ्यांवर संभ्रम आहे.
मुंबई विद्यापीठाचेही अनेक अभ्यासक्रम हे सत्र पद्धतीनुसार आहेत. म्हणजेच प्रत्येक सत्राला स्वतंत्र विषय अभ्यासण्यासाठी असतात आणि प्रत्येक सत्राची परीक्षाही होते. यंदा मात्र विद्यापीठात अद्यापही वार्षिक नियोजन जाहीर केलेले नाही.
नुकत्याच गेल्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम वर्षांच्या परीक्षा महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संपल्या आहेत. आता या शैक्षणिक वर्षांतील पहिल्या सत्र परीक्षा कधी आणि कशा होणार, याबाबत कोणीही जबाबदार व्यक्ती माहिती देताना दिसत नाही. राज्याचे शिक्षण मंत्रीही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत, असे दिसून येत आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षांच्या (2019-20) परीक्षांबाबत कोरोना प्रादुर्भावामुळे गोंधळ झाला. प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे निकालाअंतर्गत मूल्यमापन आणि आदल्या वर्षीच्या गुणांच्या सरासरीनुसार जाहीर करण्यात आले. या निकालानुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलून त्यांच्यासाठी जुलैपासून ऑनलाइन वर्गही महाविद्यालयांनी सुरू केले.
दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार साधारण जून किंवा जुलैमध्ये पहिले सत्र सुरू होऊन ते नोव्हेंबपर्यंत संपते आणि त्यानंतर सत्र परीक्षा होते. मात्र दरवर्षीच्या नियोजनानुसार पहिले सत्र संपले तरी वार्षिक वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
अनेक ठिकाणी तर महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांकडून शुल्कही घेतले आहे. मात्र, या महाविद्यालयांनी आजवर एकही तास ऑनलाईन शिक्षणासाठी दिलेला नसल्याने बहुधा विद्यार्थ्यांचे हे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.