आळंदी – विद्यार्थी जीवनात ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी ध्येय वेडे होणे गरजेचे आहे. अभ्यास आणि कामाच्या वेळेचे योग्य नियोजन करावे. शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनी त्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले. गुरूपौर्णिमानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवनातील स्वप्न साकार करण्यासाठी गुरुची भूमिका व स्थान याची सांगड घालत स्वतःच्या जीवनातील गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे सामान्य विद्यार्थी ते यूपीएससीच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त पर्यंतचा प्रेरक असा जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. बुद्धी ही कोणाची मालमत्ता नाही तिच्या बळावर आपण आपल्या मनातील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी ह.भ.प. डॉ. लक्ष्मण आसबे, निर्मलाताई जागडे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी नारायण पिंगळे, शिक्षकेतर प्रतिनिधी सोमनाथ आल्हाट, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
हभप डॉ. लक्ष्मण आसबे यांनी यावेळी गुरु व सद्गुरु यातील फरक स्पष्ट करत गुरु एक व्यक्ती नसून शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आपण सर्वांनी आपले जीवन समृद्ध करण्याकरिता वापर करावा. त्यासाठी डोळ्यासमोर समृद्ध अशा कोणाचा तरी आदर्श असावा लागते असे सांगितले. त्यांनी आपल्या खडतर व दारिद्र्याने पीडित अशा परिस्थितीवर कशाप्रकारे मात केली हे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी त्यांचा संघर्षमयी जीवनप्रवास ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.