पुणे – राज्य शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेला तांदूळ शहराच्या भागातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यास आता सुरुवात होणार आहे. पुण्यातील 640 शाळांमधील 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करुन खबरदारी बाळगून तांदूळ वाटप करण्यासाठी शाळांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
करोनाचा प्रसार वाढत चालल्याने लॉकडाऊनही वाढविण्यात येत आहे. यामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत शिल्लक असलेला तांदूळ वाटप करण्याबाबतचे आदेश राज्य शासनाने जारी केलेले आहेत. शहरी भागातील महापालिका हद्दीतील शाळांना केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत शिजविलेला आहार पुरविण्यात येत असतो. आता मात्र दोन महिन्यापासून पडून राहिलेला तांदूळ वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरातीत 22 केंद्रीय स्वयंपाकगृह आहेत. यातील सहा ठिकाणी तांदूळ शिल्लक नाही. उर्वरित स्वयंपाकगृहात 3 लाख 8 हजार 537 किलो तांदूळ शिल्लक आहे. महापालिकेच्या 293 शाळांमधील 79 हजार 185 तर खासगी अनुदानित 347 शाळांमधील 1 लाख 29 हजार 265 विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्धा ते दोन किलो या प्रमाणात तांदूळाचे वाटप होणार आहे.
केंद्रीय स्वयंपाकगृहाकडे शिल्लक असलेला तांदूळ शाळांकडे वितरित करण्यात येणार आहे. शाळेमार्फत हा तांदूळ विद्यार्थी, पालक यांना वाटप करावा लागणार आहे.
शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या मार्फत तांदूळ वितरीत करण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. तांदूळ वितरण करताना शाळा स्तरावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोशन डिस्टंन्सीगचे पालन करावे लागणार आहे. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक यांनी त्यांच्या विभागातील शाळांना भेटी देवून तांदूळ वाटपाची पाहणी करावी. प्रत्यक्ष तांदूळ वाटप करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करुन वितरणाचे कामे सुरुळीत होईल यांची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या तांदूळ वाटपाचा अहवाल दर तीन दिवसांनी करण्यात यावा, असे आदेश पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीची संस्था, शाळांचे मुख्याध्यापक यांना बजाविले आहेत.
योग्य नियोजन करावे लागणार
शहरातील बहुंसख्य शाळांमध्ये करोनाबाबत विलगीकरण कक्ष उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे तांदूळ वाटप करायचा धोका कसा काय पत्करायचा असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. मजूरांची मुले आपल्या मूळ गावी निघून गेली आहेत. त्यामुळे आता फारसे विद्यार्थी शिल्लक राहिलेले नाहीत. शहरातील बऱ्याचशा शाळा या रेड झोनमध्ये आहेत. केंद्रीय स्वयंपाकगृहातून शाळापर्यंत तांदूळ पोहचविण्यासाठी वाहतुक खर्च, मजूरांचा खर्च कोण देणार असा प्रश्न स्वयंपाकगृहाच्या संस्थाकडून पुढे करण्यात आलेला आहे. या सर्वांवर मार्ग काढून तांदूळ वाटप करावेच लागणार आहे. मुदतीत वाटप न झाल्यास शिल्लक राहिलेला तांदूळ वायाला जाण्याची शक्यता अधिक आहे.