अजून महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा : 50 लाख 42 हजार रुपये संयुक्त खात्यावर जमा
अद्याप गणवेश खरेदी केलीच नाही
शिक्षण विभागाकडून पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक दोन गणवेशासाठी सहाशे रुपये दिले जातात. प्रत्येकी तीनशे रुपयांप्रमाणे निधी शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यात वर्ग केला आहे. मात्र बहुतांशी शाळांनी उर्वरित गणवेशाचे पैसे आल्याबरोबर एकत्र गणवेश खरेदीचा विचार केला. त्यामुळे अद्याप गणवेश खरेदी केलीच नाही.
संगमनेर – सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. संगमनेर तालुक्यातील 348 शाळांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी बहुतांशी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे आणखी किमान महिनाभर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत गणवेश दिला जातो. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशासाठी लागणारा निधी दिला जातो. एका गणवेशासाठी शासनाकडून तीनशे रुपये दिले जातात. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशांसाठी सहाशे रुपये दिले जातात. शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती व दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वर्ग करतो.
तालुक्यातील 348 शाळांतील पात्र 16 हजार 809 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक गणवेश खरेदी करण्यासाठी तीनशे रुपये प्रमाणे शासनाकडून 50 लाख 42 हजार 700 रुपये एवढे अनुदान गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. रक्कम प्राप्त झाल्यानंतर लगेचच शाळांना वर्ग करण्यात आली होती. या रकमेतून गणवेश खरेदी करुन लवकर वाटप होईल, असे वाटत होते. मात्र आणखी बहुतांशी शाळांनी गणवेश खरेदी करुन विद्यार्थ्यांना वाटप केले नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यातील शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत गणवेश मिळाला नाही. विशेष म्हणजे, गणवेशासाठी लागणारी रक्कमही संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. परंतु, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गतवर्षीही शाळेचे वर्ष संपेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मिळाला नव्हता.
त्यामुळे पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जुलैचा दुसरा आठवडा उजडला तरी विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी साध्या कपड्यांत शाळेत हजेरी लावत आहेत.