दहावीच्या गुणपत्रिकांचे वाटप; पाच महिन्यांनंतर उघडला वर्ग
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून गुणपत्रिकांचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.
करोनाच्या संकटात तब्बल पाच महिन्यांनी विद्यार्थी गुणपत्रिका घेण्याच्या निमित्ताने शाळांमध्ये आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. राज्यात 3 ते 23 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल 29 जुलैला जाहीर करण्यात आला होता. मार्च महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही करण्यात आले. 15 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आलेले आहे.
पुणे विभागीय मंडळाकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका 14 ऑगस्टपासून शाळांना तालुकानिहाय वितरित करण्यात आलेल्या आहेत. शाळांनी शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालक करुन विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार व सोयीनुसार वितरण करण्यात यावे. विद्यार्थ्यांना विशिष्ट तारखेलाच गुणपत्रिका घेवून जाण्याबाबत आग्रह धरु नये. विद्यार्थी, पालक यांची एकाच दिवशी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन गुणपत्रिकांचे वाटप करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पुणे विभागीय मंडळाच्या प्रभारी सचिव प्रिया शिंदे यांनी शाळांना दिल्या आहेत.
कसे आहात तुम्ही…
शाळांमार्फत गुणपत्रिका वाटप करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये बोलावण्यात येत आहे. रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूल, अहिल्यादेवी, रेणुका स्वरूप, शाळेसह इतरही शाळांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विचारपूसही केली. विद्यार्थ्यांनाही मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांना भेटून आनंद झाल्याचे चित्र दिसून आले.