रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर : बिबट्याच्या हल्ल्यात धुवोली ता खेड येथे बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.१७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.अजय चिंतामण जठार वय १८ असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे
याबाबत स्थानिकांनी दिलेली माहिती अशी , खेडच्या पश्चिम भागात असलेल्या धुवोली ता खेड येथील बारावीत शिकणारा अजय चिंतामण जठार हा आज दि १७ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या लहान मित्रांसोबत घराजवळील डोंगरावर असेलेली जनावरे घरी आणण्यासाठी गेला होता.
त्यावेळी दबा धरून बसलेला नरभक्षक बिबट्याने अजय वर हल्ला केला त्याच्या मानेला पकडून करवंदाच्या जाळीत घेऊन गेला हे दृश्य त्याच्या मित्राने पहिले त्यांनी तेथून पळत येऊन जवळच असलेल्या घरातील लोकांना सांगितले. त्या घरातील लोकांनी इतरांना बोलावले. ग्रामस्थ घटनास्थळी गेले. तेथे अजयचा मृतदेह करवंदाच्या जाळीत आढळून आला तर बिबट्याही नजरेस पडला. आरडा ओरडा केल्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. अजय चिंतामण जठार हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे आई वडील मोल मजुरी करीत असतात त्याचे मागे भाऊ आई वडील असा परिवार आहे. बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने धुवोली गावातील नागरिकांसह परिसरात शोककळा पसरली आहे तर परिसरात बिबट्याची दहशत व भीतीयुक्त वातावरण झाले आहे.
२० जानेवारी २०२३ रोजी भिवेगाव ता खेड येथे एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यानंतर अवघ्या दीड महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे. यामुळे धुवोली परिवारातील गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. नागरिकांनी त्यावेळी नरभक्षकी बिबट्याला जेरबंद करण्याची किंवा त्याच्यावर गोळ्या घालून ठार करण्याची मागणी केली होती मात्र वन विभागाकडडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही नरभक्षक बिबट्यापासून सरणाक्षां करण्यासाठी उपाय योजना केल्या नाहीत. वन विभागाचे कर्मचारी या भागात राहत नाहीत किंवा त्यांच्याकडून ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन केले जात नसल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.
दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात अजय जठार याचा मृत्यू झाला मात्र तीन तास उलटूनही वनविभागाचे अधिकारी पोलीस घटनास्थळी पोहचले नाहीत. आरोग्य सेवेचे याभागात तीन तेरा वाजले आहेत. अशा घटना घडत असताना शासकीय यंत्रणा अलर्ट नसल्याने ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत धुवोलीचे माजी सरपंच पांडुरंग जठार यांनी सांगितले, अजय चिंतामण जठार वर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला दीड महिन्यातील या भागातील ही दुसरी घटना आहे. वनविभागाकडून काळजी घेतली जात नाही नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्याची मागणी यापूर्वी केली होती मात्र वनविभागाने दुर्लक्ष केले.जनजागृती व उपाययोजना करण्यात वनविभाग हलगर्जी पणा केला जात आहे गावोगावी यात्रा उत्सव आहेत बिबट्याचे हल्ले होते आहे या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे.