पिंपरी – बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 25) दुपारी दापोडी येथे घडली. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
गुरुवारी दुपारी तिने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर बारावीचा निकाल पाहण्यासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ती पुन्हा घरी आली. आपण नापास झाल्याचे तिने वडिलांना सांगितले. मात्र वडिलांनी काही हरकत नाही पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दे, असे सांगितले. परंतु हे दुःख सहन न झाल्याने साक्षी वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेली आणि छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.
साधारणतः 15 मिनिटांनंतर तिची आई वरच्या खोली गेली असता साक्षीने गळफास घेतल्याचे दिसून आली. आईने आरडाओरडा केल्यावर घरातील व शेजारी धावून आले. त्यांनी साक्षी हिला खाली उतरवत जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.