प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील 72 तालुक्यांत कामकाज सुरू होणार
पुणे – राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम येत्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आधी प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांप्रमाणे एकूण 72 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरू होणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर व पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याची खात्री करणे आवश्यक आहे. यासाठी 816 आधार संच उपलब्ध करून दिले आहेत. कामकाजासाठी आधार ऑपरेटरची सेवा त्रयस्थ संस्थेमार्फत उपलब्ध केली आहे. पूर्व तयारीबाबतच्या सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थीसंख्या, आधार केंद्र निश्चित करणे, त्यांच्याशी संलग्नित शाळा निश्चिती करणे, तालुकास्तरावर समन्वयक आणि जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी निश्चित करणे आदी कामे पूर्ण करावी लागणार आहेत. शाळेमध्ये आधार केंद्र स्थापन करण्यासाठी स्वतंत्र खोलीसह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. इंटरनेटचे नेटवर्क उपलब्ध करून देणे, दररोज 40 विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज करायचे असल्याने विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजाचे सुक्ष्म नियोजन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजाविले आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून अद्यापही गांभीर्याने त्याची दखल घेतली गेलेली नाही.
प्रायोगिक तत्त्वावर निवडलेले तालुके
अहमदनगर- (राहता, शेवगाव), अकोला – (बार्शी टाकळी, पातूर), अमरावती -(चांदूर, तिवसा), औरंगाबाद -(औरंगाबाद, सिल्लोड), भंडारा -(भंडारा, पवनी), बीड- (परळी, शिरुर), बुलढाणा – (बुलढाणा, मलकापूर), चंद्रपूर -(भद्रावती, नागभिड), धुळे-(शिंदोडा, धुळे), गडचिरोली -(गडचिरोली, धानोरा), गोंदिया -(तिरोडा, आमगाव), हिंगोली -(कळमनुरी, हिंगोली), जळगाव -(भडगाव, पाचोरा), जालना – (मठा, धनसावगी), कोल्हापूर – (भुदरगड, कागल), लातूर -(लातूर, अहमदपूर), मुंबई -(कांदिवली, घाटकोपर), नागपूर – (सावनेर, पारशिवनी), नांदेड -(अर्धापूर, लोहा), नंदूरबार – (नंदूरबार, तळोदा), नाशिक -(त्र्यंबकेश्वर, सिन्नर), उस्मानाबाद -(लोहारा, उस्मानाबाद), पालघर-(वसई, पालघर), परभणी -(मानवत, सोनपेठ), पुणे – (भोर, पुरंदर), रायगड -(खालापूर, कर्जत), रत्नागिरी – (चिपळूण, रत्नागिरी), सांगली – (शिराळा, खानापूर विटा), सातारा -(जावली, कोरेगाव), सिंधुदुर्ग – (सावंतवाडी, कुडाळ), सोलापूर – (माळशिरस, मंगळवेढा), ठाणे – (अंबरनाथ, शहापूर), वर्धा – (हिंगणघाट, आर्वी), वाशिम-(मंगलूरपीर, वाशिम), यवतमाळ – (महागाव, उमरखेड).