टोलसाठी आडमुठेपणा; प्रवाशांचे हाल
खेड शिवापूर येथे पीएमपी बसेस अडवल्या : चर्चा करूनही तोडगा निघेना
पुणे – पुणे-बंगळुरू महामार्गावरील खेडशिवापूर येथे टोलच्या रकमेच्या मागणीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) 10 बसेस अडवल्या होत्या. त्यामुळे बसने खेड शिवापूरमार्गे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
पीएमपी प्रशासनाकडून केतकावळे, नसरापूर, कोंढणपूर या मार्गांवर खेडशिवापूरमार्गे बसेस सोडण्यात येतात. रोज सुमारे या मार्गावरील बसेसच्या सुमारे 10 फेऱ्यांद्वारे शेकडो प्रवासी ये-जा करतात. यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. मात्र, टोल प्रशासनाच्या कारभारामुळे प्रवाशांचा नाहक फटका बसला असून, प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला.
खेडशिवापूर टोलनाक्यामार्गे ये-जा करणाऱ्या 10 बसेससाठी सुमारे 40 हजार रुपये देण्यात येत होते. मात्र, आता टोलनाका प्रशासनाने सुमारे 6 लाख देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून केली होती. ही रक्कम पीएमपीने न दिल्याने शनिवारी बसेस अडवून ठेवल्या होत्या. टोल प्रशासनाकडून एसटीप्रमाणे पीएमपीने फास्टॅग बसवावा, अशी मागणी केली आहे. मात्र फास्टॅग बसवणे पीएमपीला शक्य नाही. त्यामुळे शनिवारी टोलनाका प्रशासनाशी चर्चा केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
“पीएमपीची मागील टोलची रक्कमदेखील थकीत आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे. यापूर्वी आम्ही पीएमपीला मासिक कार्ड दिले होते. जानेवारीपासून सर्व शासकीय वाहनांना देखील फास्टॅग अनिवार्य आहे.
मात्र, पीएमपी प्रशासन अद्यापही फास्टॅग बसवला नाही. यासाठी पत्रव्यवहार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे आवाहन आम्ही केले होते. सध्याच्या टोलबाबत पीएमपी प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे,’ अशी माहिती रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.