मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा काल (दि. 26) पासून सुरुवात झाली आहे. राज्यातील गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवभोजनाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 11,274 थाळींची विक्री झाली आहे. तर सर्वाधिक विक्री ठाणे आणि नाशिक या भागांमध्ये झाली आहे. सध्या राज्यात 125 केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. या थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम एक वाटी वरण समाविष्ट करण्यात आले आहे.
राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.