नवी दिल्ली – करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे केंद्र सरकारने रेमडिसिविर इंजेक्शनच्या 50 लाख वायल संरक्षित केल्या आहेत. याशिवाय सरकार टोसिलजुमाबच्या प्रोडक्शनची सुद्धा तयारी करत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
परिस्थिती ठिक होण्यासाठी आणि पुरेसा साठा झाल्यावर नोव्हेंबरपासून करोना लसीची पुन्हा निर्यात करण्याचा विचार सुद्धा सरकार करत आहे. परंतु सध्या सरकारचे संपूर्ण लक्ष देशातच लसीकरणावर आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडिसिविर आणि टोसिलजुमाब ही महत्त्वाची औषधे होती. या औषधांच्या उत्पादनात सरकारने वाढ करेपर्यंत त्यांची कमतरता होती. देशात रेमडिसिविरचे उत्पादन वाढविण्यात आले आणि स्विस कंपनी हॉफमॅनला रोसे यांनी त्यांनी पेटेंट केल्यामुळे टोसिलजुमाब बाहेरून मागविण्यात आले.
टोसिलजुमाबचे उत्पादन आता भारतात केले जात असल्याचे केंद्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन इतर फ्रंटवरही तयारी केली आहे. सरकारने मंजूर केलेल्या एकूण ऑक्सिजन प्रकल्पांपैकी 300 प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
याशिवाय सरकारच्या विविध मंत्रालयांकडून 351 प्रकल्पही बसविण्यात येत आहेत. देशात सध्या एकूण 1244 ऑक्सिजन टॅंकर आहेत.
एप्रिलपासून दोन लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले आहेत. देशात 18 लाखाहून अधिक आयसोलेशन बेड आणि 1.25 लाख आयसीयू बेड आहेत