मुंबई – मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडे, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्यमानता कमी झाली आहे.
पालघरमधील दहाणू येथे 12 तासांत विक्रमी 350 मीमी पावसाची नोंद झाली आहेत. तसेच ठाण्यातही 150 मीमी पावसाची नोंद झाली आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
सिंधुदुर्गमधील जनजीवन विस्कळीत
दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील खारेपाटणमधून जाणाऱ्या सुख नदीला पूर आल्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच सुख नदीला पूर आल्याने खारेपाटण बाजारपेठेमध्ये पाणी शिरले. बांद्यातून वाहणारी तेरेखोल नदीलाही पूर आल्यामुळे आळवाडा तसेच बांदा बाजारपेठेतही पाणी घुसले. तर कुडाळ तालुक्यातील भांनसाळ नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.
कोल्हापूरात 23 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलीच बॅटिंग केली असून 24 तासात पंचगंगेच्या पाणीपातळीत चौदा फुटांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दिवसभरत राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टक्क्यांची वाढ झाली असून धरण 77 टक्के भरलं आहे. पावसाचा जोर वाढल्याने एक राज्यमार्ग तर दोन जिल्हा मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.