कराची – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील डोंगररांगांच्या भागात आज भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. या भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली. त्यामध्ये किमान 22 जणांचा मृत्यू आणि 300 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मृतांमध्ये 6 लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांमध्ये महिला आणि बालकांची संख्या लक्षणीय आहे.
अनेकजण पडलेल्या घरांच्या ढिगाऱ्यांखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. भूकंपीामुळे बऱ्याच मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
भूकंपाचा पहिला धक्का पहाटे 3.20 वाजता जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरनालच्या जवळ जमिनीखाली 15 किलोमीटरवर होता, असे इस्लामाबादेतील नॅशनल सेसमिक मॉनिटरींग सेंटरने म्हटले आहे. या भूकंपामुळे नेमके किती नुकसान झाले आहे, याचा नेमका अंदाज अद्याप येऊ शकलेला नाही.
बलुचिस्तानमधील क्वेट्टा, सिबी, हरनाई, पिशीन, किला सैफुल्ला, चमन, झियारात आणि झोब या भागांना या भूकंपाचे हादरे जाणवले. मरण पावलेले किंवा जखमी झालेले ईशान्येकडील हरनाई जिल्ह्यातील आहेत. भूकंपाची तीव्रता 5.9 मॅग्निट्युड उतकी होती, असे युएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. नंतर येणाऱ्या आणखीन भूकंपांमुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अजूनही काही भागांमध्ये आफ्टरशॉक जाणवत आहेत.
भूकंपप्रवण क्षेत्रामुळे वारंवार भूकंप
बलुचिस्तान प्रांत भूकंप प्रवण असल्यामुळे या बागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. 2013 च्या सप्टेंबरमध्ये बलुचिस्तानमध्ये तीव्र भूकंमप जाणवला होता. त्याचा केंद्रबिंदू आवारन जिल्ह्यात होता. त्या भूकंपात किमान 825 जणांचा मृत्यू झाला होता. शेकडो घरांचे नुकसान झाल्यामुळे बेघर झालेल्यांची संख्याही अधिक होती. तर 8 ऑक्टोबर 2005 मध्ये झालेल्या भूकंपात तब्बल 74 हजार जजणांचा मृत्यू झाला होता.