निम्म्या पेक्षा जास्त कराड बंदच
काल बुधवारी सोळवंडे खून प्रकरणानंतर संपूर्ण कराड बंद होते. तसेच येथील वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी सकाळी शहरातील काही भागातील दुकाने सुरू होती. मात्र, खून प्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे महात्मा फुले चौक व परिसरात जमावाचे जथ्थे लागल्यानंतर महात्मा फुले चौक, नगरपरिषद परिसर, चर्च, पोस्ट ऑफिस, आझाद चौक यासह अर्ध्याहून जास्त कराड बंद होते.चार ते पाच टोळ्यांना मोक्का लावणार
कारडमध्ये वर्चस्ववादातून टोळ्यांची धुसफूस सुरू आहे. यातूनच पवन सोळवंडेचा निर्घृण खून झाला आहे. येणाऱ्या काळात अशा टोळ्यांना पोलिसांनी टार्गेट केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची हिटलिस्ट काढली आहे. त्यांची सखोल चौकशी करून शहरातील चार ते पाच टोळ्यांना मोक्का लावण्याचे संकेत पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिले आहेत.
कराड – कराडात वर्चस्ववादातून भर वस्तीत पवन सोळवंडेचा मंगळवारी रात्री खून करण्यात आला. याचा परिणाम शहरात बुधवारी दिवसभर कडकडीत बंद पहायला मिळाला. सायंकाळपर्यंत वातावरण निवळले असे वाटत असताना दुसऱ्या दिवशी गुरुवारीही जमावाने शहरातील दुकाने लक्ष केली. काही टोळक्यांनी जबरदस्तीने दुकाने, हातगाडे, पानटपऱ्या बंद केल्या. हे करत असताना दमदाटी, दगडफेक, मारहाणीच्या घटनादेखील यावेळी घडल्या.
या खून प्रकरणाचे पडसाद शहरात दुसऱ्या दिवशी गुरुवारीही उमटले. बसस्थानक परिसर, बुधवार पेठ, पोस्ट ऑफिस, प्रीतिसंगम उद्यान व यशवंत हायस्कूल या ठिकाणी दगडफेक करण्यात आली. ज्या ठिकाणी दुकाने सुरू आहेत. त्या ठिकाणी दमदाटी, शिवीगाळ करून व्यापारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले.
या प्रकरांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून टोळक्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्या दि. 23 रोजी सावडणे विधी असून त्या दिवशी एकदा अनुचित प्रकार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सतर्कता दर्शवत बंदोबस्तात वाढ केली असून गुरुवारी रात्रीपासून संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वातावरण तणावपूर्ण करणाऱ्या इसमांवर करडी नजर ठेवण्यात आली असून त्यांच्यावरही कायद्याचा बडगा उगारण्यात येणार आहे.
शहरातील बसस्थानक, पोस्ट ऑफिस व प्रीतिसंगम बाग येथे दमदाटी करून लोकांना दुकाने बंद करण्यास काही टोळक्यांनी भाग पाडले. तसेच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बस स्थानक परिसरात दगडफेक केल्याचा प्रकार घडला. तर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येथील टिळक हायस्कूल परिसरात जमावाने दगडफेक केली.
सोळवंडे खून प्रकरणानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या परिस्थितीत येथील महात्मा फुले चौकात आज सकाळी मोठा जमाव जमला होता. यावेळी सोळवंडे खून प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात असलेल्या आक्रमक जमावास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी विनंती करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करून शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर आलेल्या पावसाच्या सरींनी जमाव पांगण्यास मदत झाली.