कुरकुंभमध्ये कंपनीविरोधात घोषणाद्वारे तरुणांनी व्यक्त केला निषेध
कुरकुंभ- येथील एमआयडीसीमधील अल्काईल अमाईन्स केमिकल या कंपनीमध्ये भीषण आग लागल्यामुळे कुरकुंभ गावातील स्थानिकांना बुधवारी (दि. 14) रात्री 11 वाजता गाव सोडून दहा किलोमीटर अंतरावर जाण्याची वेळ आली होती, यामुळे अल्कली अमाईन्स कंपनीचा निषेध म्हणून आज (दि. 16) कुरकुंभ गावातील महाविद्यालय, शाळांसह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. याबरोबरच कंपनीच्या गेटजवळ गुरूवारी (दि. 15) “कंपनी बंद’ करण्याबाबत नागरिकांनी घोषणाबाजी केली.
अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये बुधवारी (दि. 14) लागलेली आग ही जीवितास धोका देणारी ठरू शकली असती. या कंपनीमध्ये हायड्रोजनचा स्फोट झाला तर परिसरातील असंख्य नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. कुरकुंभ एमआयडीसीमध्ये अशा स्फोटाच्या घटना वेळोवेळी घडत असतात, प्रशासनाकडून वेळीच दखल घेतली जात नाही,प्रदूषण, आग अशा घटनांचा होणारा त्रास वेळीच थांबवावा, या मागणीसाठी कुरकुंभ गावातील ग्रामस्थांनी गाब पूर्णपणे बंद ठेवून कंपनीचा निषेध केला.
- आम्हाला आमचा जीव प्रिय आहे…
“अल्काईन’मध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर कुरकुंभसह आसपासच्या परिसरातील तरुणांनी एकत्र येत गुरुवारी (दि. 15) कंपनीच्या गेटसमोर एकत्र येत कंपनीच्या विरोधात “कंपनी बंद’च्या घोषणा देत निषेध नोंदवला. आम्हाला रोजगार नको आमचा जीव प्रिय आहे, आमच्या घरातील लहान मुले, महिला यांना विनाकारण त्रास झाला आहे, यामुळे ही कंपनी ताबडतोब बंद करावी अशी घोषणा बाजी सुरू केली.कंपनी विरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याने कंपनीच्या आत मध्ये व गेटबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. - कुरकुंभ एमआयडीसीमध्ये याआधी देखील अनेक छोट्या-मोठ्या आगीचौया घटना घडल्या आहेत. बुधवारी (दि. 14) अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीला आग लागल्याने परिसरातील लोक घाबरून गेले आणि सुरक्षित ठिकाणी त्यांना पोहोचवले होते, या कंपन्यांच्या हलगर्जीपणाचा त्रास येथील नागरिकांना विनाकरण सहन करावा लागत आहे. या निषेधार्थ येथील ग्रामस्थांनी आपली दुकाने बंद ठेवत पूर्णपणे बंद पाळला आहे.
-सूर्यकांत भागवत, उपसरपंच कुरकुंभ