पुणे – आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला येत्या 9 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्पर्धेसाठी अत्यंत कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. कुटुंबीय वगळता खेळाडूंना भेटण्याची परवानगी खुद्द बीसीसीआयच्या पदाधिकारी व सदस्यांनाही देण्यात येणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्याच एका सदस्याने दिली आहे. यंदाच्या स्पर्धेची सलामीची लढत गतविजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात होणार आहे.
करोनामुळे यावेळी आयपीएलच्या नियमांमध्ये अत्यंत कठोर बदल करण्यात आले आहेत.
ही स्पर्धी अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई व कोलकाता या सहा शहरांतच खेळवली जाणार आहे. कोणत्याही संघाला त्यांच्या घरच्या मैदानात एकही सामना खेळता येणार नाही. लागोपाठ दुसऱ्या वर्षी प्रेक्षकांशिवाय आयपीएलचे सामने खेळवले जातील. गेल्या वर्षी करोनामुळे आयपीएल अमिरातीत खेळवली गेली होती.
वेळेत षटके पूर्ण करण्याचे बंधन
आयपीएल स्पर्धेत यंदाच्या नियमावलीत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक सामन्याच्या एका डावातील 20 षटके 90 मिनिटांत (दीड तास) पूर्ण करणे गरजेचे आहे. जर वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत, तर कर्णधारासह सर्व खेळाडूंना दंड तसेच तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. याच 90 मिनिटांच्या वेळेत अडीच मिनिटांच्या दोन स्ट्रॅटेजिक टाईम आऊटच्या वेळेचाही समावेश करण्यात आला आहे. जर वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत, तर कर्णधारासह सर्व खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून ठरावीक टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे.
प्रसंगी चेंडूही बदलण्यात येणार
प्रत्यक्ष सामन्यात खेळाडूकडून चेंडू हाताळताना करोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर पंच त्याच क्षणी चेंडू बदलतील. क्रिकेटचा चेंडू करोनाचा वाहक नसल्याचे जरी सांगितले जात असले तरीही कोणताही धोका होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. चेंडूला कोणी लाळ लावली तर त्याला पहिल्यांदा समज दिली जाईल. तसेच चेंडू चौकार किंवा षटकाराच्या वेळी मैदानाबाहेर गेला व सापडला नाही तरी दुसरा चेंडू घेतला जाईल व तो सॅनिटाईझ केल्यावरच वापरला जाईल.
कुटुंब आणि मालक बायोबबलमध्ये
खेळाडू व त्यांचे कुटुंब व संघ मालक यांना बायोबबलमध्येच राहावे लागणार आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच त्यांना बायोबबलमधून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.
हॉटेलमध्येही कठोर निर्बंध
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी संपूर्ण हॉटेल एका संघाला राखीव करावे लागणार आहे. जर ते शक्य नसेल तर एक विंग राखीव ठेवावी लागणार असून, तिथेही बायोबबल सुरक्षा असेल. जे खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ संघाचा भाग आहेत, त्यांना हॉटेलबाहेर जाता येणार नाही व बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हॉटेलमध्ये जाता येणार नाही.
व्यवस्थापक बनणार सीसीटीव्ही
बायोबबलचे पालन करण्यासाठी प्रत्येक संघासाठी चार सदस्यांचे बबल इंटिग्रिटी मॅनेजर पथक तयार केले जाणार आहे. हे पथकच जणू सीसीटीव्ही बनणार आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर कडक नजर ठेवली जाणार आहे.
बबल टू बबलची सुविधा
खेळाडूंसाठी विलगीकरणाचा त्रास होऊ नये, यासाठी जे संघ किंवा जे खेळाडू सध्या अन्यत्र काही सामने खेळत असतील व बायोबबलमध्येच राहात असतील तर त्यांना बीसीसीआयने बबल टू बबल ट्रान्सफरची परवानगी दिली आहे. त्यामुळे आशा खेळाडूंना भारतात आल्यावर विलगीकरणात राहण्याची गरज नाही.
चाचणी मात्र बंधनकारक
आयपीएलच्या बायोबबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, सपोर्ट स्टाफ तसेच संबंधितांना एकूण तीन करोना चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असेल तरच त्यांना आयपीएलच्या बायोबबलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
हॉटेलमध्येही चेक-इन डेस्क
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हॉटेलमध्येही चेक-इन डेस्क तयार करण्यात येणार आहे. खेळाडू हॉटेलमधील रूमपासून ते मैदानापर्यंत बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
पदाधिकारी व सदस्यांनाही मज्जाव
बीसीसीआयचे अधिकारी तसेच सदस्य यांच्यावरही बंधने ठेवली जाणार आहेत. आयपीएलच्या वैद्यकीय अधिकारी पथकाच्या परवानगीशिवाय या पदाधिकारी व सदस्य यांना कोणत्याही खेळाडूला तसेच बायोबबलमध्ये असलेल्यांना भेटता येणार नसल्याचे बीसीसीआय व आयपीएल समितीने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकारी व सदस्याने या नियमाचा भंग केल्यास संपूर्ण स्पर्धेसाठी त्याच्यावर निलंबनाची कारवाईही केली जाणार आहे.