पुणे – राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वारंवार सूचना दिल्या आहेत. परंतु अजूनही ती भरली गेली नाहीत. प्राध्यापकांची रिक्त पदे न भरल्यास यूजीसीला कडक भूमिका घ्यावी लागेल, असे “यूजीसी’चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.
“यूजीसी’ने महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी प्राध्यापकांची रिक्त पदे 100 दिवसांत भरावीत, असे निर्देश दिले होते. त्यानंतरही राज्यातील तब्बल चार हजार पदे रिक्त आहेत. याबाबत पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. पटवर्धन यांनी प्राध्यापकांची पदे रिक्त ठेवल्यास यूजीसीला कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र, यूजीसीने त्याचा वापर केला नाही, असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.
दरम्यान, प्राध्यापकांची पदे भरावीत याबाबत यूजीसीकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. राज्यपालांबरोबर झालेल्या बैठकीतही याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यांनी प्राध्यापक भरतीबाबत प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे, असे सांगत डॉ. पटवर्धन म्हणाले, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने प्राध्यापकांची रिक्त पदे न भरणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द केली.
यूजीसीला सुद्धा याप्रमाणे कडक कारवाईचे अधिकार आहेत. परंतु, पाठपुरावा व चर्चा करून पदे भरली गेली नाहीत तर यूजीसीला कठोर पाऊले उचलावी लागतील, असेही ते म्हणाले.