पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून नियंत्रण
पुणे – शहर व ग्रामीण भागात अन्न धान्याचा व जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत होणे व अन्न धान्याची साठेबाजी होऊ न देणे यावर प्रतिबंधासाठी शहरी भागसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी तर ग्रामीण भागासाठी जिल्हा पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
या समितीमध्ये कृषि अधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव, पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे अधिकारी, गॅस वितरण संघटना, पेट्रोल-डिझेल वितरक संघटना, भुसार व्यापर संघटना यांचे अध्यक्ष आणि सहकार विभगाचे उपनिबंधक यांचा समावेश असणार आहे. ही समिती अन्नधान वितरण व्यवस्थित होत असल्याची खात्री करणार आहे.
यावर राहणार देखरेख
अत्यावश्यक व जीवनावश्यक सुविधा उपलब्ध आहेत. यावर ही समिती नियंत्रण ठेवणार आहे. किराणा दुकाने, रेशन धान्य दुकाने, भाजीपाला विक्रीची ठिकाणी, दूध व वैद्यकीय सेवा देणारी दुकाने, दवाखाने आदी दुकाने सुरू राहणार आहेत. याद्वारे नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यात अडचण येणार नाही, यादृष्टीने ही समिती काम करणार आहे. नागरिक अनावश्यकरित्या वाहने, खासगी वाहने, दुचाकीवरून एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाणार नाहीत, यावर नियंत्रण ठेवणार आहे. अनावश्यक हालचाली टाळण्यासाठी विविध ठिकाणी प्रवेश मार्गावर बॅरिकेट्स, नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याबाबत बंधनकारक करावे.