नगर – नगर जिल्ह्यातील करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तथापि, त्याची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनीच निर्बधांचे कडक पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री मुश्रीफ यांनी काल करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिका आरोग्याधिकारी अनिल बोरगे, डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदी यावेळी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘‘सध्या जिल्ह्यासह राज्यातही करोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात व नगर शहरात विनामास्क फिरणारे नागरिक दिसत आहेत. संसर्ग वाढविण्यास तेच कारणीभूत ठरत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक जागांवर नागरिक विनामास्क दिसणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे.
नागरिकांनीही त्यादृष्टीने स्वत:च्या व इतरांच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे. महापालिका क्षेत्रात तसेच काही तालुक्यांच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हायला हवी.’’
वाढीव बिलांवर अंकुश ठेवा
जिल्हा प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या व संभाव्य वाढ लक्षात घेऊन कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित केली आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात अधिक औषधसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा करणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात काही खासगी रुग्णालयांकडून वाढील बिले आकारत असल्याचा तक्रारी येत आहेत. त्याची शहानिशा करून तत्काळ कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
लसीची अट रद्द करावी
केंद्र सरकारने बाकीच्या देशांना लस देण्यापेक्षा आपल्या देशाला लस द्यावी. तसेच, लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची अट काढून टाकावी, लसीकरण बंधनकारक करावे, असेही पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.