मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत काही जण महिलांवर अत्याचार करत आहेत. अशा लोकांविरोधात पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, ‘राज्यातील संपूर्ण पोलिस यंत्रणा लॉकडाऊनमध्ये २४ तास काम करत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कुणी महिलांना त्रास देत असले, त्यांच्यावर अत्याचार आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीसांना दिले आहेत.’ आपल्या राज्यातील महिलांना सुरक्षित वाटलेच पाहिजे, असे देखील गृहमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. राज्यात एका दिवसात आणखी २२१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृतांचा आकडा १४९ झाला आहे.