सौरव गांगुली यांचे स्वच्छता अभियान
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट स्वच्छता अभियानच जणू सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर कोणा भारतीय क्रिकेटपटूने गैरवर्तन केल्याचे समोर आले तर त्याची गय केली जाणार नाही, असे सांगत कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
देशाच्या क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक खेळाडूंनी गैरवर्तन केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पहिल्यांदा केलेली चूक म्हणून त्यावेळी त्यांना समज देऊन सोडण्यात आले. मात्र, या गोष्टींना कायमचा पायबंद घालायचा असेल तर केवळ समज देण्यापेक्षा कारवाई केली तरच बाकी खेळाडूंना इशारा मिळेल. तसेच त्यांच्या वर्तणुकीतही सुधारणा होईल.
गेल्या काही वर्षांत आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात अनेकदा खेळाडूंकडून चूक होते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबरोबर तसेच पंच किंवा सहकारी खेळाडूंशी देखील अनेकदा गैरवर्तन घडल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे मतही गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
नियम सर्वांसाठी समान असतील. कोण मोठा कोण नवोदित असा फरक केला जाणार नाही. जो चुकेल त्याला शिक्षा केली जाईल. दोषी आढळल्यावर त्या खेळाडूंना माफ केले जाणार नाही, असा इशाराही गांगुलीने दिला.
व्हिवो करार मोडणार
चीनची मोबाइल कंपनी असलेल्या व्हिवोकडून आयपीएलसाठी 5 वर्षांचा करार करण्यात आला होता. मात्र, चीनबाबत सध्या देशात वाढत असलेल्या असंतोषाच्या दबावापुढे ही कंपनी आपला करार यंदाच्या वर्षापुरता मोडणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काळात जर दोन्ही देशांच्या संबंधात सुधारणा झाली तर हा करार नव्याने 5 वर्षांच्या मुदतीसाठी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.