“सीएए’समर्थक रॅलीमुळे काही काळ दगडफेक; जाफराबाद मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी बंद
मोठा पोलीस बंदोबस्त, अश्रुधुराचा मारा
नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरूच आहे. जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये आज शेकडो महिलांनी आंदोलन केले. मात्र भाजप नेते कपिल मिश्रा यांनी याच भागात “सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी जमावांना हुसकावून लावण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली, असे प्राथमिक वृत्त आहे.
“सीएए’विरोधी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला असल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर टाळला. त्यामुळे दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांना स्टेशनमध्ये प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करावे लागले. केंद्र सरकारने “सीएए’ मागे घेतल्याशिवाय येथून मागे हटणार नाही, असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे. आंदोलनामुळे या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या महिला असल्यामुळे पोलीस महिलांनाही पाचारण करण्यात आले होते. जाफराबाद स्टेशनवरील प्रवेश व बाहेर जाण्याचे गेट बंद करण्यात आले आहे. या स्टेशनवर गाड्या थांबणार नाहीत, असे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ट्विट केले आहे.
ईशान्य दिल्लीतील जाफराबाद भागात शनिवारी रात्री सुरू झालेले आंदोलन आज (रविवारी) देखील सुरूच होते. सुमारे 200 महिला आंदोलक जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये हातात तिरंगा ध्वज घेऊन धरणे धरून बसल्या होत्या. रात्रीदरम्यान आंदोलकांना अधिक महिला आणि युवक येऊन मिळाले. त्यामुळे आंदोलकांची संख्या खूप वाढली होती.
सरकार हा विषय जसा हाताळत आहे त्या विरोधात लोकांमध्ये नाराजी आहे, असे सामाजिक कार्यकर्ते फहीम बेग म्हणाले.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुख्य सीलमपूर रस्ता आणि कर्डमपुरीजवळ यापूर्वीच आंदोलन सुरू झाले आहे. शाहीन बागेमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार तेथील वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न मध्यस्थांकरवी केले जात आहेत. आंदोलक महिलांबरोबरच्या त्यांच्या चर्चेतून अद्याप कोणताही निष्कर्श निघालेला नाही.