सातारा – करोनाच्या संकटामध्ये कोणत्याही सुविधेची व सुरक्षेची पर्वा न करता सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्वच कामगार रात्रंदिवस शहर स्वच्छ व करोना विषाणूमुक्त ठेवण्यासाठी काम करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत होत असले तरी काही ठिकाणी या कर्मचाऱ्यांवर हल्ले करत शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांना पळवून लावण्याचे प्रकार होत आहेत. नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून ही बाब गंभीर व निषेधार्य आहे. या घटनेचा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील संबंधितांवर कारवाईची मागणी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेतील आरोग्य विभागातील महिला कर्मचारी संगीता दत्तात्रय गायकवाड, रीना गणेश कंडारे, वंदना जगन्नाथ येवले या नेहमीप्रमाणे गुरुवार परज याठिकाणी काम करत होते. यावेळी एका व्यक्तीने तुच्छतेच्या भावनेने या महिलांना हटकले. मोठ्या आवाजात अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. त्यानंतर अंगावर धावून गेल्याने भीतीपोटी त्या महिला कर्मचारी तेथून निघून आल्या.
नगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची कसलीही दखल घेतली नाही. याबाबत युनियनच्यावतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना जाब विचारला असता याबाबत माहित नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. होमगार्डला मारहाण झाल्यानंतर सर्व पोलीस ताफा जाऊन तातडीने गुन्हा दाखल होतो. मात्र, सफाई कामगारांची तक्रार घेतली जात नाही, हा अन्याय असल्याचे खंडाईत यांनी पत्रकात म्हटले आहे.
सुरक्षिततेची हमी न घेतल्यास आंदोलन
पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांना शुक्रवारी निवेदन सादर करून पालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी घेणार नसेल तर काम बंद आंदोलनाचा इशारा अखिल महाराष्ट्र कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली दिला आहे. या प्रकरणी या महिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कर्मचारी महासंघानेसुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांना निवेदन सादर केले.
मात्र कामगार कर्मचारी महासंघाने या प्रकरणावर काम बंद करून पालिकेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन सफाई कामगारांना योग्य ते संरक्षण मिळावे अशी मागणी केली. दोषींना कठोर शासन करण्याचे लेखी निवेदन चंद्रकांत खंडाईत यांनी सादर केले. निवेदनाची ही प्रत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई मेल करण्यात आल्या आहेत.