मध्य रेल्वेकडून चौथी लाईन तयार करण्याचा विचार सुरू
पुणे – पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर येणारा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून चौथी लाईन तयार करण्याचा विचार सुरू आहे. तर दरडप्रवण (दरड कोसळणाऱ्या) क्षेत्रामध्ये बोगदेदेखील तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे मंकी हिल ते नागनाथ स्थानकाच्या परिसरातील पुलाखालील मातीचा भराव वाहून गेला होता. परिणामी सध्या त्या परिसरामध्ये मातीऐवजी सिमेंटचा भराव घालण्यात येत आहे. यासह पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील बोरघाट विभागात अप-लाइनच्या दुरुस्तीचे (पुणे ते मुंबई) काम सुरू आहे. यामुळे दि. 3 ऑक्टोबरपासून या मार्गावरील काही गाड्या पूर्णत: तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे, ज्यामुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि 5 इतर 3 ऑक्टोबरपासून वळविण्यात आल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक मागील 4 महिन्यांपासून विस्कळीत झाले होते. यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. पर्यायाने रेल्वे प्रशासन आता चौथी रेल्वे लाईन उभारण्याच्या विचारात आहे.
पुणे-मुंबई मार्गावर तीन रेल्वे लाइन आहेत. घाट विभागात अपलाईन, मिडललाइन आणि डाऊनलाइनहून रेल्वे धावतात. सध्या प्रशासन चौथी लाइनचा प्रस्ताव विचाराधीन आहे. चौथी रेल्वेलाइन सुरू झाल्यास रेल्वे वाहतुकीला दिलासा मिळणार असून अधिकाधिक गाड्या घाटातून सोडता येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
दरडप्रवण क्षेत्रात बोगदे तयार करणार
बोरघाटातील रेल्वे मार्गावर अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अपघात होण्याच्या शक्यतेसह रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरड कोसळणाऱ्या ठिकाणी लहान आकारांचे चार ते पाच बोगदे तयार करण्यात येणार आहेत. वारंवार दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची पाहणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पावसाळ्यामध्ये कोसळणाऱ्या दरडींवर रोखण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा म्हणून लहान बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रस्ताव प्राथमिक अवस्थेत असून, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या विषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे सुतार यांनी नमूद केले.