खेड-आळंदी मतदारसंघात उमेदवार-कार्यकर्त्यांची होणार दमछाक
राजगुरूनगर – राज्यात एकाच टप्प्यात दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी अवघे 12 दिवस मिळणार आहे. त्यात खेड-आळंदी विधानसभेचा पसारा मोठा असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांचा प्रचारादरम्यान कस लागणार आहे. नामांकन दि. 4 ऑक्टोबरला दाखल झाल्यानंतर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया दि. 7 ऑक्टोबर आहे. त्यामुळे दि. 8 ऑक्टोबरपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे.
दि. 8 पासून तर दि. 20 ऑक्टोबरपर्यंत प्रचार चालणार आहे, या 12 दिवसांत उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी 189 गावांतील मतदारांशी संपर्क साधावा लागणार आहे. खेड-आळंदी मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जवळपास 80 कि.मी.चे अंतर आहे, एवढे अंतर पार करून मतदारापर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांत उमेदवार व कार्यकर्त्यांना दिवस-रात्र राबून मतदारापर्यंत पोहोचावे लागणार आहे.
या अवघड परीक्षेत नेमका कोणता पक्ष आणि उमेदवार उत्तीर्ण होतो, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे, प्रचारासाठी अवघे 12 दिवस मिळाल्यानंतर निकालासाठी मात्र, तिसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतदान आटोपल्यावर मतमोजणी दि. 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजेच दि. 21 ते दि. 24 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते “ऑक्सिजन’वर राहणार आहे. एकीकडे प्रचाराला कमीवेळ मिळत असताना निकाल तिसऱ्या दिवशी लागणार असल्याने हे तीन दिवस उमेदवार, कार्यकर्ते केवळ आकडेमोड करण्यात व्यस्त राहणार आहेत.