राशीन येथे प्रचारसभा; खा. सुजय विखे यांची उपस्थिती
कर्जत – कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पन्नास वर्षे सत्ता दिली. राज्यातील अनेक प्रश्नांचा त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला. सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून जनतेला झुंजवले. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले.राम शिंदे यांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केले. त्यांनी प्रत्येकवेळी समाजाचे हित जोपासत जनतेच्याच प्रश्नाचा विचार केला. त्यामुळे याही वेळी त्यांनाच बळ द्या, असे आवाहन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारसभेत कर्जत तालुक्यातील राशीन येथे ते बोलत होते. यावेळी खा. सुजय विखे पाटील यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, मतदारसंघातील महिलांना बचत गटामार्फत काम दिले जाईल. फाईव्ह स्टार एमआयडीसी उभारणार आहे. दुष्काळी भागाला कुकडीचे पाणी देण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले. यापुढेही पाणी तसेच रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देणार आहे.
सध्या पैशाच्या जोरावर निवडणूक सुरू आहे. आमच्या गरिबीची चेष्टा करु नका. हा मतदार विकासाला मत देणारा आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही शिंदे यांनी केले. खा. सुजय विखे म्हणाले, राष्ट्रवादीचे लोक यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यालयात भेटणार नाहीत. त्यांना भेटायचं असेल तर येरवड्यात जावे लागेल. ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे पाणी नेलं, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं त्यांच्याबाबतीत सहानुभूती, संवेदनशीलता दाखवण्याची गरज नाही. हे लोक स्वार्थी आहेत, ते जनतेचे कधी होऊ शकलेले नाहीत, त्यांना धडा शिकवा. आपण 24 तारखेला राम शिंदे यांचा विजयोत्सव साजरा करू.
उदयनराजेंचा पवारांवर हल्लाबोल
पवारांवर बोलताना उदयनराजे म्हणाले, विरोधकांचे नेते आता विचलित झालेत. आपल्या वयाचे भान न ठेवता विचित्र हातवारे करीत आहेत. राज्यातील अनेक तरुणांनी राजकीय स्वप्न पाहिली होती. मात्र, यांच्या कुटील राजकारणामुळे त्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले. अजित पवारांवर बोलताना ते म्हणाले, राज्य सहकारी बॅंकेत गैरव्यवहारात अडकलेल्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर आत्मक्लेष करणारे साधू नव्हे तर डाकू आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांचा विचार केला असता तर आत्मक्लेष करण्याची वेळ आली नसती.