नवा रायपूर (छत्तीसगड 2024 loksabha elections ) – देशातील जनविरोधी भाजप सरकारपासून जनतेची सुटका व्हावी यासाठी देशात एक व्यवहार्य राजकीय पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसपक्षाकडून केला जाईल आणि त्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेतले जाईल असे प्रतिपादन कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही त्याग करण्यास कॉंग्रेस पक्ष तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस महासमितीच्या 85 व्या अधिवेशनात बोलताना खर्गे म्हणाले की, देशाच्या संवैधानिक आणि लोकशाही मूल्यांवर सतत आक्रमण सध्या सुरू आहे. चीनच्या सीमेवर राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. महागाईने कळस गाठला आहे, बेरोजगारी विक्रमी पातळीवर गेली आहे. या आव्हानांचा देश सध्या मुकाबला करीत असून यातून जनतेला सुटका हवी आहे.
सध्याच्या कठीण परिस्थितीत कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो सक्षम आणि निर्णायक नेतृत्व देऊ शकतो असे ते म्हणाले.
2004 ते 2014 पर्यंत समविचारी पक्षांसोबत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने देशातील जनतेची सेवा केली, आम्ही पुन्हा एकदा लोकविरोधी आणि अलोकतांत्रिक भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत एक व्यवहार्य पर्याय तयार करण्यास उत्सुक आहोत.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना, खर्गे म्हणाले की दिल्लीत बसलेल्यांचा डीएनए “गरीबविरोधी” आहे, ते लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील या प्रचलित परिस्थितीच्या विरोधात जनआंदोलनाचे आवाहन त्यांनी केले. स्वत:ला प्रधान सेवक म्हणवून घेणारे केवळ आपल्या मित्रांचेच हित साधत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र सोडले.