वाहन विम्याच्या अटी, शर्थी न पाळल्यास मोजावी लागणार मोठी किंमत
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – गाडीचा विमा आहे, पण विम्याच्या नियमाचे पालन केले नाही तर, सावधान… अपघात झाल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी गाडी मालकाच्या स्थावर अथवा जंगम मालमत्तेवर टाच येऊ शकते. सुधारित मोटार वाहन कायद्यामधील तरतुदीनुसार 149 (4) हे कलम वगळण्यात आले आहे. त्यानुसार हा बदल झालेला आहे. 1 सप्टेबर 2019 नंतर झालेल्या अपघातासाठी हा नियम लागू आहे.
अपघातातील जखमी व्यक्ती अथवा मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. दाखल दाव्यावरून न्यायालय आदेश देते. प्रथमत: नुकसान भरपाईची जबाबदारी वाहनमालकाची आहे. वाहन विमा असल्यास विमा कंपनी भरपाई रक्कम देते. विमा नसल्यास अर्थातच नुकसानभरपाईची रक्कम मालकाला द्यावी लागते. मात्र, आता सुधारित नियमानुसार विम्याच्या अटी, शर्थींचे पालन न केल्यास नुकसान भरपाईची रक्कमही थेट मालकाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे वाहन मालकाने विम्याच्या परवान्याचे नूतनीकरण वेळीच केले पाहिजे. पूर्वी 149 (4) नुसार मालकाने विम्याच्या अटी, शर्थींचे पालन केले नाही, तरीही नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीलाच द्यावी लागत असे. त्यानंतर विमा कंपनीने ती रक्कम मालकाकडून वसुल करण्याची तरतुद कायद्यात होती. विमा कंपन्या वाहन मालकाकडून नुकसान भरपाई वसुल करत. कधी वसुली व्हायची, तर, कधी होत नसे.
काय आहेत नियम
नियमानुसार वाहन चालकाकडे परवाना असणे आवश्यक आहे. तो नसल्यास अपघात झाल्यास नुकसान भरपाई थेट मालकाला द्यावी लागणार आहे. याबरोबरच ट्रान्सपोर्ट वाहनासाठी परमिट आणि फिटनेस असणे आवश्यक आहे. तर नॉन ट्रॉन्सपोर्ट वाहनासाठी पॉलिसी असणे आवश्यक आहे. पॉलिसीचे वेळीच नूतनीकरण आवश्यक आहे.
वाहन विमा असलाच पाहिजे. त्याच्या अटी, शर्थींचे पालन केले पाहिजे. कागदपत्रे “अपडेट’ ठेवली पाहिजेत. अन्यथा वाहन मालकाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अलीकडे अनेकांचे उत्पन्न वाढले आहे. पगाराची रक्कम मोठी असते. पगार, भविष्यातील पगारवाढीचा विचार करून न्यायालय नुकसान भरपाईचे आदेश देते. ही रक्कम लाखो, कोट्यवधी रुपयांत असते. मालकाला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रसंगी घर विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
– ऍड. जी.पी. शिंदे, मोटार वाहन कायदा विश्लेषक