तलवार व चाकूने मारहाण केल्याच्या परस्परविरोधी तक्रारी
भुईंज – उडतारे (ता. वाई) येथील बाळासाहेब हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन सुरू असताना पालकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून चिडून जाऊन प्रशांत उर्फ मन्या रवींद्र बाबर याने विवेक विष्णू बाबर यांच्यावर तलवारीने वार केल्याची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे
याबाबत भुईंज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, उडतरे येथील बाळासाहेब हायस्कूलमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि. 20) स्नेहसंमेलन झाले. त्यावेळी कुणीतरी लहान मुलाला दगड मारला म्हणून विवेक बाबर यांनी दगड कुणी मारला, असे विचारले. त्यानंतर विवेक बाबर व हरीश बाबर यांच्यात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात होऊन प्रशांत उर्फ मन्या बाबर याने आपल्यावर तलवारीने वार केला तर हरीश बाबर याने लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची फिर्याद विवेक बाबर यांनी दिली आहे. या प्रकरणी हरीश बाबर यांनीही फिर्याद दिली आहे. विवेक बाबर याने चाकूने आणि विष्णू धर्माजी बाबर, शंकर धर्माजी बाबर, संतोष महादेव बाबर, अनिल श्रीरंग बाबर, आशिश संजय बाबर व संजय साबळे यांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे हरीश बाबर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार धायगुडे व पोळ तपास करत आहेत.