नगर – सन 2019-20 मधील भंडारदरा व मुळा धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणी साठा विचारात घेवून खरीप पिकांसाठी आवर्तन पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. खरीप पिकासाठी सध्या या दोन्ही धरणातून एक-एक आवर्तन सोडण्यात येणार आहे.
सन 2019-20 मधील भंडारदरा धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणी साठा विचारात घेवून प्रवरा नदी (भंडारदरा ते ओक्षर) प्रवरा डावा व उजवा तट कालव्यावरील पिण्यासाठी तसेच औद्योगिक कारणासाठी दि. 15 जुलै 2020 पर्यंत लागणारे पाणी आरक्षीत करुन जे पाणी शिल्लक राहत आहे, त्या शिल्लक राहत असलेल्या पाण्यामध्ये खरीप हंगाम सन 2019-20 (दि. 1.7.2019 ते 14.10.2019) मध्ये प्रवरा डावा व उजवा तट कालव्यावरील लाभक्षेत्रातील उभ्या उस, फळबाग, अन्न धान्यचारा व इतर खरीप हंगामी पिकांना खालील अटीस व शर्तीस अधिन राहून प्रत्येक खातेदारास खरीप हंगामातील एक पाणी देण्याचे सध्या नियोजित आहे.
इच्छूक शेतकरी बांधवांनी वरील पिकांचे पाणी अर्जसंबंधीत शाखा कार्यालयात दि. 3 सप्टेंबर पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत दाखल करावे.सध्या खरीप हंगामात एकच आवर्तन देण्याचे प्रस्तावित आहे. पाण्याचा एकुण नियोजनात काही बदल झाल्यास नियोजीत मागणी क्षेत्रात बदल होणे क्रमप्राप्त आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. शेतकऱ्यांनी शेतचाऱ्या स्वखर्चाने दुरूस्त करून घ्याव्यात. शेतचाऱ्या नादुरूस्त असल्यास पाणी देण्यात येणार नाही. ही मंजुरी महाराष्ट्र शासन सिंचन कायदा सन 1976 यातील तरतुदी व प्रचलित शासन धोरण व आदेशास अनुसरून राहील. तरी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त् फायदा घेऊन अन्न-धान्याचे उत्पादन वाढवावे.असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच,मुळा जलाशयातील उपलब्ध पाणी साठा विचारात घेऊन पिण्यासाठी तसेच औद्योगिक कारणासाठी दिनांक 15 जुलै 2020 पर्यंत लागणारे पाणी आरक्षित करून जे पाणी शिल्लक राहत आहे त्या पाण्यामध्ये खरीप हंगाम सण 2019-2020 आवर्तन क्र. 1 मध्ये दिनांक 1 जूलै 2019 ते 14 ऑक्टोबर 2019 या मुदतीत लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना व ठिबक उपसा सिंचन धारकांना पाटपाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
तरी लाभ क्षेत्रातील पाणी वापर संस्था चालकांनी त्यांची मागणी दि. 31 ऑगस्ट 2019 अखेर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत संबंधित पाटबंधारे शाखा कार्यालयात सादर करावी.तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातील न्यायालयीन निर्णयानुसार अथवा शासन निर्णयानुसर पाणी पुरवठ्यात वाढ / कपात होऊ शकते. सध्या खरीप हंगामात एकच आवर्तन देण्याचे प्रस्तावित असल्याचे मुळा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता सा.रा. पाटील यांनी कळविले आहे.