ऑस्कर विजेता, प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांनी नुकताच आरोप केला होता की, त्यांच्याविरोधात बॉलीवूडमधील एक टोळी काम करत असून त्यामुळे मला काम मिळण्यात अडचणी येत आहे. त्यानंतर आता आणखी एक ऑस्कर विजेता रसूल पुकुट्टी यांनीही तसाचा आरोप केला आहे.
शेखर कपूरने रहमान यांच्या मुलाखतीवर रिमार्क केल्यानंतर रसूल पुकुट्टी यांनी हे विधान केले आहे. रहमान यांच्या वक्तव्यावर शेखर कपूरने ट्विट करत लिहिले होते की, तुला तुझी समस्या माहिती आहे का ए.आर. रहमान? तू ऑस्कर जिंकला आहेस. बॉलीवूडमध्ये याला मरणाला मिठी मारणे असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे की, तुझ्याकडे इतकी हुशारी आहे की, बॉलीवूड तुला सांभाळू शकत नाही.
शेखर कपूरच्या या ट्विटनंतर रसूल पुकुट्टीने ट्विट केले की, डियर शेखर कपूर मला याबद्दल विचारा, मी तर ब्रेकडाउनच्या मार्गावर होतो, मला हिंदी चित्रपटसृष्टीत कोणतेही काम मिळत नव्हते आणि रिजनल सिनेमाने मला ऑस्कर जिंकल्यानंतरही काम दिले. अशी बरीच प्रॉडक्शन हाऊस आहेत, ज्यांनी मला गरज नाही असे सांगितले. पण तरीही मी या इंडस्ट्रीवर प्रेम करतो.