अमृतसर – किसान मजदूर संघर्ष समितीने वादग्रस्त कृषी विधेयकाच्या निषेधार्थ सुरू केलेले रेल्वे रोको आंदोलनाला गुरुवारी सुरुवात झाली. पंजाबमध्ये ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे पंजाबमधील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. अनेक प्रस्तावित रेल्वे रद्द करण्यात आल्या.
भारतीय किसान युनियनने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संघटनेने संगूर आणि बर्नाल येथे रेल्वे रोको केले. समितीच्या कार्यकर्त्यांनी अमृतसर आणि फिरोझपूर येथेच रेल्वे वाहतूक अडवली. अमृतसरमध्ये देविदासपूर आणि फिरोझपूरमध्ये बस्ती तलाव येथे आम्ही रेल्वे रोखल्या. जर ही विधेयके मागे घेतली नाहीत तर आम्ही आमचे आंदोलन आणखी तीव्र करू. अखिल भारतीय किसान संघर्ष समनव्य समितीच्या भारत बंदलाही या संघटनांनी पाठिंबा दिला आहे, असे किसान मजदूर संघर्ष समितीचे श्रवणसिंग पांदेर यांनी सांगितले.
आमच्या मागण्यांना देशातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करून पांधेर म्हणाले, आमच्या निदर्शनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय पक्षांच्या नेत्यांना करून दिला जाणार नाही. आमच्या निदर्शनांना अन्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
रेल्वेच्या फिरोझपूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशेष रेल्वेच्या 28 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतुकीदरम्यान प्रवाशी आणि मालाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या बंदमध्ये 250 संघटना
विधेयकाला विरोध करण्यासाठी सुरू असणारी निदर्शने तीव्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या 31 संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उद्याच्या भारत बंदमध्ये देशभरातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुमारे 250 संघटना सहभागी होत आहेत. त्यामुळे देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.