सातारा/कराड – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी तासवडे, ता. कराड येथे टोल नाक्यावर आणि दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. साताऱ्यात पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
केंद्र सरकारचा आरसीईपी करार व राज्य शासनाची कर्जमाफी धोरणाचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. याबाबत संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना “लूटवापसी’ म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या. शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळेल, अशी धोरणे आखावीत, नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल.
अशी पीक विमा योजना सुरू करावी, शेतजमिनींचे हक्क कसणाऱ्यांच्या नावे करावेत, शेतीच्या सर्वंकष, शाश्वत व गतिमान विकासासाठी डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार पर्यायी शेती धोरणाची आखणी करावी. दरम्यान, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, जाहीर एफआरपीप्रमाणे दर द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरूच राहतील, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.
स्वाभिमानीच्या कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तासवडे येथे टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करत घोषणाबाजी केली. पदाधिकाऱ्यांनी तळबीड पोलिसांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता केली. राज्य शासनाने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय अन्यायकारक असून सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, विकास पाटील, प्रमोद जगदाळे, संदीप पवार, दादासाहेब यादव, बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे, विक्रम कदम व शेतकरी सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.