करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली असतानाही परजिल्ह्यांतील मजूर मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत असल्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलावीत, याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करावी, असे स्पष्ट निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विभागीय आयुक्तांना दिले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण व पुणे येथील विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा करून करोना व्हायरस संक्रमण आणि लोकांचे स्थलांतर याबाबत माहिती घेतली. यावेळी ते बोलत होते. सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमधून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा. त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी सरकार तसेच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास तसेच भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यपालांनी यावेळी दिले.