वाल्हे ग्रामस्थांची रेल्वे अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
वाल्हे -आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींचे संजीवनी समाधीस्थळ पुरंदर तालुक्यातील वाल्हे हे आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशातील आदिवासी, कोळी बाधवांचे हे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे येथे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली.
रेल्वे बोर्डाच्या पीएसी कमिटीचे चेअरमन पी. के. कृष्णदास यांना याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती पुरंदर तालुका भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सचिन लंबाते यांनी दिली. यावेळी रेल्वे बोर्ड सदस्य डॉ. राजेंद्र फडके, दौंडचे आमदार राहुल कुल, राजेंद्र जगताप, प्रवीण कुमठेकर, सचिन पेशवे आदी उपस्थित होते.
सचिन लंबाते म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांचा पालखी सोहळा याठिकाणी मुक्कामी असतो. वाल्हे येथे येण्यास भाविकांना खासगी वाहन किंवा नीरा बस स्थनकावर उतरून येथे यावे लागते, त्यामुळे वेळ आणि अर्थिक नुकसान होते; पण सह्याद्री व कोयना एक्सप्रेस, तसेच कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या अतिजलद गाड्यांना वाल्हे येथे थांबा मिळाल्यास भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय टळणार आहे. याबाबत कृष्णदास यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.