आळंदी – पिंपरी-चिंचवड येथील रुग्णाची संख्येत वाढ होत असल्याने या पार्श्वभूमीवर आळंदी परिसर आता पुण्याच्या धर्तीवर सील करण्याची मागणी केली जात आहे. अद्यापही नागरिक बेफिकीरपणे फिरताना दिसून येत आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी, अतिउत्साही कार्यकर्ते व सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे मदत, रेशन, जेवण वाटताना सोशल डिस्टन्सबाबत खबरदारी घेताना दिसत नाही.
आळंदी (ता. खेड) नगरपरिषदेने भाजी विक्रेत्यांना दिलेल्या जागी भाजी विक्रेते बसत नाहीत तर जुन्या एसटी स्टॅंडसमोर सात-आठ दुकानाने लागलेली दिसत आहेत. त्यांच्याकडून दुप्पट-तिप्पट भावाने भाजी विकली जात आहे. त्यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, तसेच शेतकरी बांधवांना भाजी विकण्यासाठी अडवणूक केली जात आहे.
शेतकरी बांधवांना सुध्दा भाजी विकण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे जेणेकरून गोर गरीब नागरिकांची अर्थिक लुट होणार नाही, सध्या काही कुटुंबांना या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.
घराचे भाडे थकले आहे, पिण्याचे पाणीसुध्दा विकत घ्यावे लागत आहे, लाईट बिल द्यायचे आहे, अशा अनेक अडचणींना काही कुटुंबांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या सर्व भाज्यांचे भाव वाढले आहेत. किरणा माल विकणारा दुकानादार उधारीसाठी थांबू शकतो; पण भाजीवाल्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
गर्दी टाळणे गरजेचे
भाजी खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी उसळते आहे; पण याठिकाणी कसलेही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. भाजी मंडई, किराणा दुकाने येथे लोक अद्यापही गर्दी करीत आहेत, त्यामुळे आळंदी परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ शकतो, असेही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत, त्यामुळे तातडीनं सर्व आळंदीकरवासीयांनी जागृत होणे गरजेचे आहे.
मास्क लावूनच बाहेर या सर्वांनी घरातच थांबा, अत्यावश्यक काही काम असेल तरच घराच्या बाहेर पडा तेपण घरातील एका व्यक्तीने बाहेर येताना मास्क लावून यावे. दुपारी एकपर्यंत किरणा माल आणि भाजीपाला दुकाने सुरू आहे, त्यानंतर कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे नगरपरिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.