पुणे – राज्यातील गेल्या 24 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाच्या वाटचाल संथ गतीने सुरू असून, मान्सूनने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला आहे.
दरम्यान, पुढील आठ दिवस राज्यात पावसाच खंड पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील साधारण 9 जुलैपर्यंत पावसामध्ये खंड असेल. त्यामुळे कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 6 जुलै रोजी दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.