राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वरे मागणी
इंदापूर : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी (दि. 25) करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करुन भाजप सरकार विरोधकांची गळचेपी करत असल्याच्या प्रकाराचा पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. तसे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात येणार असल्याचे ही या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानूसार आज सकाळी प्रदीप गारटकर, संभाजी नाना होळकर, माणिकराव झेंडे,भारतीताई शेवाळे, महादेवराव कोंढरे,सचिन घोटकुले, रवी काळे, आप्पासाहेब पवार जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पक्षाची भूमिका असणारे निवेदन दिले.
लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात, विशेषतः बिगरभाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात, विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात.आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधांनकर्त्याना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपण आमची ही भूमिका केंद्र शासनास व राज्य शासनास कळवावी, अशी अपेक्षा निवेदनात शेवटी व्यक्त करण्यात आली.