नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमातून पंतप्रधान देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मार्गदर्शन करतात. देशभरातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी समाधानकारक उत्तरे दिली.
दरम्यान, आज तालकटोरा स्टेडियममध्ये २०० विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते. तर देशभरातून या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होण्यासाठी ३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. मात्र यावेळी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची चर्चा व्हावी, म्हणून यावर्षी हा कार्यक्रम लवकर आयोजित करण्यात आला.
“कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात. बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसं फसवलं? हे ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”, असा संदेश मोदी यांनी दिला.
There is a very thin line between criticism and obstruction. Parents must criticise in a constructive, positive way: PM Modi during 'Pariksha Pe Charcha' 2023 pic.twitter.com/mecNyljn3w
— ANI (@ANI) January 27, 2023
विद्यार्थ्यांना विषय समजावा, तसेच ते कंटाळू नयेत यासाठी पंतप्रधान मोदी देखील मध्येच विनोद करताना पाहायला मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मोदींपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन सूत्रसंचालक विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली होती. आपले निवेदन झाल्यानंतर मोदी पुढच्या प्रश्नांसाठी तयार होते, मात्र सूत्रसंचालक स्टेजवर उपलब्ध नव्हते. त्यावेळी मोदी म्हणाले की, “अरे भाई अँकर कहा गये?” मोदींच्या या प्रश्नानंतर विद्यार्थी सूत्रसंचालक घाईघाईत स्टेजवर आले आणि प्रश्न विचारु लागले, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थीनीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, आपण आवडीच्या विषयात अधिक वेळ घालवतो. त्यामुळे काही विषय अर्धवट राहून जातात. त्याचा भार वाढतो. त्यामुळे आधी अवघड विषयाची तयारी सुरु करा. तसेच यावेळी त्यांनी पालकांना उद्देशूनही मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांकडून अतिरीक्त अपेक्षा करु नयेत. मुलांवर दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनी दबाव घेऊ नये, यासाठी मोदी यांनी क्रिकेटमधील फलदांजाचे उदाहरण दिले. “क्रिकेट सामना पाहताना लोक चौकार – षटकार असे ओरडत असतात. पण फलंदाज काही लोकांचे ऐकून फलंदाजी करत नाही. तो जसा चेंडू येईल तशी फलंदाजी करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे.”असा सल्ला देखील यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.