पुणे/कात्रज – वारकरी संप्रदायाची अस्मिता, कळसस्थान किंबहुना महाराष्ट्राचे आराध्य स्थान असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाने बिडी उत्पादन निजामाबाद येथील झुंबरलाल गोरधन या उत्पादकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रशासनाने या उत्पादन निर्मितीस बंदी आणावी तसेच आजवर वितरित केलेल्या संपूर्ण उत्पादनाचा माल ताब्यात घ्यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, आंबेजोगाई या जिल्ह्यांमध्ये या उत्पादनाची विक्री आजही चालू आहे. समाजातील अपप्रवृत्ती व व्यसनांना आळा बसावा याकरिता संपूर्ण आयुष्य ज्या जगद्गुरूंनी समाजासाठी अर्पण केले, असे संत तुकाराम महाराजांच्या नावाने बिडी उत्पादन करून सदर उत्पादकाने केवळ वारकरीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनमनाच्या भावनांचा अपमान केला आहे, असे
जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र वारकरी महामंडळाने म्हटले आहे. बिडी उत्पादन तातडीने बंद करण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सांप्रदायाकडून देण्यात आला आहे. यावेळी संपर्क प्रमुख गणेश महाराज भगत हवेली अध्यक्ष गोरख मुजुमले, गुलाबराव बोबडे आदी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कार्याध्यक्ष रामेश्वर शास्त्री, सचिव रेवाजी वाळुंज, उपाध्यक्ष जालिंदर काळोखे, गणेश महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयात महामंडळाच्या विभागाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आली आहेत.
…नाठाळाचे माथी हाणू काठी।।
छत्रपती संभाजी बिडी काढून महाराजांचा तसेच आता संत तुकाराम महाराज अशा युगपुरुषांच्या अवमान प्रकरणी सदर उत्पादकास कठोरात कठोर शासन करावे अन्यथा महाराष्ट्र वारकरी महामंडळ संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भले तरी देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।। अशा शब्दांत देण्यात आला आहे.