पिंपरी – गेल्या वर्षी आक्या बॉण्ड टोळीतील अनिकेत रणदिवे याचा 29 मे 2020 रोजी खून झाला होता. त्याच्या खुनानंतर आक्या बॉण्ड टोळीने 30 मे रोजी घरकुल परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती. त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी (दि. 29 मे) रात्री पहायला मिळाली. रणदिवे खून प्रकरणातील आरोपी वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या परिसरातील वाहनांची पुन्हा तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरकुलातील गॅंगवॉर अजूनही धुमसत असल्याचे दिसून येत आहे.
अतुल निसर्गंध तसेच चंद्या उर्फ महेश चंदनशिवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मन्या कोरी, आरोपी अतुल निसर्गंध याचा लहान भाऊ तसेच त्यांच्यासोबत असलेले अन्य दोन साथीदार (नाव, पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ सिद्धार्थ बालाजी गायकवाड (वय 28, रा. घरकुल, चिखली) यांनी या प्रकरणी रविवारी (दि. 30) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोयत्याने व सिमेंटच्या गट्टूने दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी फिर्यादी व अन्य नागरिक येथे आले, असता आरोपींनी त्यांच्या दिशेने सिमेंटचे गट्टू फेकले. तसेच आरोपींनी नागरिकांना पाहून आरडाओरडा करून शिवीगाळ केली. “जो आमच्या नादी लागेल त्याला मारून टाकू’, अशी धमकी देऊन आरोपींनी काही कारण नसताना परिसरात दहशत माजवली.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करीत आहेत.