मुंबई – आशियायी शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर दुपारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात खरेदी होऊन निर्देशांक वाढले. परदेशी संस्था गुंतवणूकदार पुन्हा भारताकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले असल्यामुळे खरेदी होत असल्याचे दिसून आले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 85 अंकांनी वाढून 61,308 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंकांनी म्हणजे 0.29 टक्क्यांनी वाढून 18,308 अंकांवर बंद झाला.
अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा, मारुती, स्टेट बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. एचसीएल टेक्, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, टेक् महिंद्रा, पावर ग्रीड, सन फार्मा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सकाळच्या सत्रामध्ये विक्रीचा जोर होता. मात्र दुपारी चीनमधील विकास दर बऱ्यापैकी वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आशियाई शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर तीन महिन्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 3,117 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली असल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यामुळे दुपारच्या सत्रात खरेदी होऊन निर्देशांकांना आधार मिळाला.
गेल्या आठवड्यात बऱ्याच कंपन्यानी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्याचबरोबर घाऊक किमतीवरील महागाई कमी होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भारतातील वातावरण सकारात्मक आहे. मात्र ओमायक्रॉन कशी वाटचाल करतो यावर निर्देशांकांची पुढील वाटचाल अवलंबुन असल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनेद नायर यांनी सांगितले.
मात्र भारताच्या दृष्टीकोणातून चिंतेची बाब म्हणजे आतापर्यंत कमी पातळीवर असलेले क्रुडचे दर आता वाढू लागले आहेत. आता क्रुडचा दर 86 डॉलरवर गेला आहे. त्याचबरोबर अमेरीकेच्या व्याजदरवाढीमुळे रुपयाच्या मुल्यावर दबाव येत आहे. त्यामुळे भारताच्या आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढून चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्यता आहे.