मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत असतानाच वाहन आणि दुरसंचार क्षेत्रासाठी केंद्र सरकारने बुधवारी बऱ्याच सवलती जाहीर केल्या. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 417 अंकांनी वाढून 59,141 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स प्रथमच 59 हजार अंकाच्या वर गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 110 अंकांनी म्हणजे 0.63 टक्क्यांनी वाढून 17,629 या नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.
इंडसइंड बॅंकेचा शेअर सात टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर आयटीसी, स्टेट बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, ऍक्सिस बॅंकेने आजच्या तेजीचे नेतृत्व केले. मात्र या परिस्थितीतही टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
काल आणि आजही जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आले. तरी भारतीय शेअर बाजारात मात्र खरेदी चालूच आहे. आजच्या कामकाजाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक चालूच आहेत. या गुंतवणूकदारांनी काल 232 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. अमेरिका नजीकच्या भविष्यामध्ये व्याजदरात वाढ करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक भारतामध्ये येत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
आज बॅंकांच्या शेअरची जास्त खरेदी झाली. अनुत्पादक मालमत्ता वाढण्याच्या शक्यतेमुळे या अगोदर गुंतवणूकदारांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते. मात्र कर्जपुरवठा वाढण्याच्या शक्यतेमुळे बॅंकांच्या शेअरची जास्त खरेदी झाली असे जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. बॅंकिंग क्षेत्राबरोबरच ऊर्जा, तेल, आणि नैसर्गिक वायू, धातू, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचेही निर्देशांक उंचावले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप अर्धा टक्क्यापर्यंत वाढले. शेअर निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या भारतीय कंपन्यांच्या शेअरचे बाजार मूल्य आता फ्रान्समधील शेअर बाजारापेक्षा जास्त झाले आहे.