मुंबई – भारतातील महागाई वाढून औद्योगिक उत्पादन कमी झाल्याची आकडेवारी काल जाहीर झाली. मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात खरेदी चालूच असल्यामुळे सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले.
अमेरिकेतील महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. अमेरिकेत आतापर्यंत करण्यात आलेल्या व्याजदर वाढीमुळे महागाई कमी भरण्याची शक्यता परदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 455 अंकांनी वाढून 60,571 अंकावर बंद झाला. ही निर्देशांकाची पाच महिन्यातील उच्चांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 133 अंकांनी म्हणजे 0.75 टक्क्यांनी वाढून 18,070 अंकावर बंद झाला. गेल्या चार दिवसात सेन्सेक्स 1,540 अंकांनी तर निफ्टी 445 अंकांनी वाढला आहे.
बजाज फिन्सर्व, इंडसइंड बॅंक, एअरटेल, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टीसीएस कंपनीच्या शेअरचा भाव मात्र कमी झाला. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,049 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. अमेरिकेसह इतर देशातही शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात वाढल्यानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढली असल्याचे दिसून आले.
मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.32 टक्क्यांनी वाढून 26,252 अंकावर गेला. स्मॉल कॅप 0.24 टक्क्यांनी वाढून 29,893 अंकावर गेला. ग्राहक वस्तू, वित्त, धातू, भांडवली वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे या क्षेत्रांचे निर्देशांक वाढले. तर ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, रिऍल्टी या क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे गुंतवणूक अधिकारी व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, सध्याची बाजारातील तेजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीमुळे चालू आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्यामुळे भारतीय शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल असे या गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर आहेत.
……..