मुंबई – अमेरिकेतील किरकोळ किमतीवर महागाईचा दर 40 वर्षाच्या उच्चांकावर गेला आहे. आगामी काळामध्ये अमेरिका व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी जवळजवळ तीन टक्क्यांनी कोसळले.
त्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात दिवसांमध्ये 9.75 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारानी दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय शेअर बाजारात नोंद केलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य कमी होऊन 245 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
महागाई कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व बॅंकेसह जगातील इतर रिझर्व बॅंकांनी व्याजदरात वाढ केली आहे. आगामी काळातही ही वाढ चालूच राहणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भांडवलाचा वापर कमी होऊन कंपन्यांचा नफा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात शेअर बाजारात विक्रीचा सपाटा चालू आहे. रशिया- युक्रेन युद्ध लांब चालल्यामुळे जागतिक पुरवठासाखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतासारख्या देशाला कच्चे तेल आणि खाद्य तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे. यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत.