मुंबई – अपेक्षेप्रमाणे रिझर्व बॅंकेने व्याजदरात अर्धा टक्के वाढ केली आहे. गुंतवणूकदारांना ही वाढ अपेक्षित होती. त्यामुळे पतधोरण जाहीर झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात निवडक खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक चार दिवसानंतर वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 427 अंकांनी वाढून 55,320 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 121 अंकांनी वाढून 16,478 अंकांवर बंद झाला. आजच्या तेजीचे नेतृत्व रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉक्टर रेड्डीज, भारतीय एअरटेल, सन फार्मा, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांनी केले. रिलायन्स इंडस्ट्रीज वाढल्यामुळे मुख्य निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला. मात्र टाटा स्टील, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, स्टेट बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सेन्सेक्ससंदर्भातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज वाढ नोंदली गेली. परदेसी संस्थागत गुंतवणुकदार विक्री करीत असूनही देशातील किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे आज शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. माहिती तंत्रज्ञान, औषधी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली.
मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.6 4 टक्क्यांनी वाढला असल्याचे दिसून आले. रुपया घसरत असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार मात्र विक्री चालूच ठेवत आहेत. या गुंतवणूकदारांनी काल 2,484 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर झाले आहे. आता अमेरिका आणि युरोपातील रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. अमेरिका व्याजदरात किती वाढ करण्याची घोषणा करते याकडे परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येते.
कालच्याप्रमाणे आजही शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्रीच्या लाटा येत होत्या. मात्र आता भारतीय निर्देशांक पुरेसे कमी झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात काही प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता काही विश्लेषकांनी व्यक्त केली.