मुंबई – देशात व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे सावध झालेल्या गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून सोमवारी शेअर बाजार निर्देशांकांत बरीच घट नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 949 अंकांनी म्हणजे 1.65 टक्क्यांनी कमी होऊन 56,747 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 284 अंकानी कमी होऊन 16,912 अंकांवर बद झाला.
विक्रीचा जोर इतका जास्त होता की सेन्सेक्स संदर्भातील सर्व 30 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. इंडसइंड बॅंक. बजाज फिन्सर्व, भारती एअरटेल, आयटीसी, टेक महिंद्रा या कंपन्यांचे जास्त नुकसान झाले. एकूण जागतिक अनिश्चित परिस्थिती पाहता परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून आजही या गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बॅंक व्याजदराबाबत या आठवड्यात काय निर्णय घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी रुपयाचे नुकसान
सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मुल्य एकाच दिवसात 5.80 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. भारतात ओमायक्रॉन हा करानाचा प्रकार आढळून येत आहे. रुग्नांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊन कंपन्यांची नफादायकता कमी होईल असे वाटत असल्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारात एकतर्फी घसरण चालू आहे.