मुंबई – भारताचा विकास दर वाढत आहे. करोना रुग्नांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढत असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जोरदार घोड-दौड करीत आहेत. शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकात वाढ होऊन निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 277 अंकांनी वाढून 58,129 या विक्रमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स प्रथमच 58,000 अंकाच्या पुढे बंद झाला आहे. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 89 अंकांनी वाढून 17,323 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स तब्बल 2005 अंकांनी म्हणजे साडेतीन टक्क्यांनी वाढला आहे. तर निफ्टी 618 अंकांनी वाढला आहे. हरित ऊर्जा क्षेत्रात आगामी काळात मोठे काम करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर चार टक्क्यांनी वाढला.
भारतातील सेवा क्षेत्राची उत्पादकता ऑगस्ट महिन्यामध्ये वाढली असल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली असल्याचे दिसून आले. आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार कुंपणावर बसून होते. मात्र गेल्या आठवड्यापासून या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदी चालू केली आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. काल या गुंतवणूकदारांनी 348 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने वर्षाअखेरपर्यंत व्याजदर कमी पातळीवर ठेवण्याचे संकेत दिल्यामुळे परदेशी संस्थापक गुंतवणूकदार सक्रीय झाले असल्याचे दिसून येते. शुक्रवारी ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, धातू, ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक साडेतीन टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र दूरसंचार, वित्तीय सेवा या क्षेत्रांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाल्याचे दिसून आले.