मुंबई, दि.15- सरकारी रोख्यांवरील परतावा वाढत असतानाच करोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. शिवाय गेल्या आठवड्यात महागाई वाढल्याची आणि औद्योगिक उत्पादन कमी झाल्याचे आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 397 अंकांनी म्हणज 0.78 टक्क्यांनी कोसळून 50,395 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 101 अंकांनी कमी होऊन 14,919 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फिन्सर्व, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, एल अँड टी, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. तर टेक महिंद्रा, पावर ग्रिड, इंडसइंड बॅंक, महिंद्रा टेक कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले.
याबाबत बोलताना रिलायन्स सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, रोख्यावरील परतावा आणि करोना रुग्णाच्या संख्येमुळे अगोदरच वातावरण नकारात्मक असताना स्थूल अर्थव्यवस्थेबाबत निराशाजनक आकडेवारी जाहीर झाली आहे.
जानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन उणे 1.6 टक्के झाले आहे तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई 5.3 टक्क्यांवर गेली आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार निराश झाले. सोमवारी घाऊक किमतीवरील महागाई निर्देशांक वाढवून 4.17 टक्के इतका झाला आहे.
इंधनाचे दर वाढले आहेत. या कारणामुळे आगामी काळात इतर वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. जागतिक बाजारातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे लघु पडल्या तरी शेअर बाजारात खरेदीसाठी फारसे पूरक वातावरण नाही असे त्यांनी सूचित केले.